केंद्रीय कृषिमंत्री शिवराजसिंह चौहान यांचा इशारा
नवी दिल्ली : वृत्तसंस्था
आता शेतीच्या योजना बंद खोल्यांमध्ये नव्हे तर शेतात केल्या जातील. दिल्लीतील शेतकऱ्यांनाही केंद्र सरकारच्या प्रत्येक कृषी योजनेचा लाभ मिळेल, असा ग्वाही केंद्रीय कृषी मंत्री शिवराजसिंह चौहान यांनी दिली. यावेळी त्यांनी कृषी-ड्रोन तंत्रज्ञानाचे निरीक्षण केले आणि बोगस खते आणि किटकनाशके तयार करणाऱ्या विरोधात सरकार कठोर कायदा आणणार असल्याची घोषणा केली.
विकसित कृषी संकल्प अभियान अंतर्गत आज केंद्रीय कृषीमंत्र्यांनी भारतीय कृषी संशोधन परिषदेच्या वरिष्ठ अधिकारी आणि शास्त्रज्ञांसह दिल्ली बाहेरील तिगीपूर गावाला भेट दिली आणि शेतकऱ्यांशी संवाद साधला, त्यावेळी ते बोलत होते. यावेळी त्यांनी शेतकऱ्यांशी बियाणे उत्पादन, पॉलीहाऊस शेती, स्ट्रॉबेरी उत्पादन आणि इतर नगदी पिकांशी संबंधित उत्पादनाबद्दल चर्चा केली. त्यांनी उदयोन्मुख शेतकऱ्यांचे अनुभव जाणून घेतले, त्यांचे कौतुक केले आणि असे प्रगतीशील शेतकरी देशाच्या नव्या शेतीचे प्रणेते आहेत, असे त्यांनी सांगितले.
यानंतर चौहान यांनी ड्रोन तंत्रज्ञानाचे प्रात्यक्षिक पाहिले, यावेळी ड्रोनद्वारे कीटकनाशके आणि पोषक तत्वे फवारण्याच्या आधुनिक पद्धती सादर केल्या गेल्या. त्यांनी संशोधकांकडून तंत्रज्ञानाचा खर्च, परिणामकारकता आणि ऑप्टिमायझेशनबद्दल विचारपूस केली. यावेळी शिवराजसिंह यांनी रोपवाटिकेलाही भेट दिली आणि शेतकऱ्यांशी चर्चा केली आणि त्यांच्या शेतीबद्दल जाणून घेतले.
आता बंद खोल्यांमध्ये नव्हे, फिल्डवर संशोधन होणार
यावेळी केंद्रीय मंत्री शिवराज सिंह किसान संमेलनाला हजर झाले. याप्रसंगी त्यांनी बंद खोल्यांमध्ये संशोधन केले जाणार नाही तर शेतकऱ्यांसोबत शेतातच केले जाईल. संशोधकांनी गावांना भेट देऊन केलेल्या अभ्यासाआधारे शेतकऱ्यांसाठी योजना आखल्या जातील. गेल्या १५ दिवसांत देशभरातील आयसीएआरच्या २,१७० पथकांनी शेतकऱ्यांमध्ये जाऊन तंत्रज्ञान आणि संशोधनाबद्दल प्रबोधन केले आहे. शेतकऱ्यांच्या समस्या ऐकून उपाय शोधण्यासाठी जलद काम केले गेले आहे आणि उर्वरित समस्यांसाठी गंभीर प्रयत्न सुरू आहेत, असे म्हटले.