पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांचे प्रतिपादन
सांगली : महाराष्ट्र शासनाच्या जलसंपदा विभागामार्फत १५ ते ३० एप्रिल २०२५ या कालावधीत राज्यात सर्वत्र ‘जलव्यवस्थापन कृती पंधरवडा‘ उपक्रम राबविण्यात येत आहे. शेतकरी संवाद व तक्रार निवारण, राज्यातील विविध महामंडळांचे सक्षमीकरण, सांडपाण्यावर प्रक्रिया करून त्याचे पुनर्वापर तसेच त्यासंदर्भात जनजागृती ही या उपक्रमाची प्रमुख उद्दिष्ट्ये आहेत. सोमवारी सांगली जिल्ह्याचा पालकमंत्री या नात्याने चंद्रकांत पाटील यांनी सदर पंधरवड्याअंतर्गत जिल्ह्यातील जलसंपदा विभागाच्या विविध संगणक प्रणालींचे उद्घाटन केले.
यावेळी संबोधित करताना पाटील म्हणाले, जलसंपदा विभागाच्या वतीने सुरू असलेल्या जल व्यवस्थापन कृती पंधरवड्याच्या माध्यमातून भविष्यकालीन गरज ओळखून पाणी व्यवस्थापनाची दिशा देण्यात आली आहे. याद्वारे जलसाक्षरता, पाणीबचतीचे महत्त्व व वापरलेल्या पाण्यावर पुनर्प्रक्रिया करून त्याचा पुनर्वापर यासाठी प्रयत्न व्हावेत. पाणी व्यवस्थापनाद्वारे दीर्घकालीन शाश्वत उपाययोजनांची अंमलबजावणी करावी, असे प्रतिपादन चंद्रकांत पाटील यांनी येथे केले.
जिल्हाधिकारी कार्यालयातील जिल्हा नियोजन समिती सभागृहात आयोजित या बैठकीस खासदार विशाल पाटील, आमदार सदाभाऊ खोत, आमदार सुधीर गाडगीळ, आमदार रोहित पाटील, जिल्हाधिकारी अशोक काकडे, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी तृप्ती धोडमिसे, कृष्णा खोरे महामंडळाचे माजी अध्यक्ष व माजी खासदार संजय पाटील, पाटबंधारे विभागाचे अधीक्षक अभियंता सी. एच. पाटोळे आदि मान्यवर उपस्थित होते.
जलसंपदा विभाग, महाराष्ट्र राज्य कृष्णा खोरे विकास महामंडळ, पुणे, मुख्य अभियंता (जलसंधारण), जलसंपदा विभाग, पुणे व अधीक्षक अभियंता, सांगली पाटबंधारे मंडळ यांच्या वतीने हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.
जल व्यवस्थापन कृती पंधरवड्यात प्रत्येक दिवशी करावयाचे काम ठरवून दिले आहे. शासनाच्या या उपक्रमाची प्रभावी अंमलबजावणी करत असल्याबद्दल पाटबंधारे विभागाचे अभिनंदन करून पालकमंत्री चंद्रकांत पाटील म्हणाले, उपलब्ध पाणी बाष्पीभवन व पाणीचोरीने कमी होऊ नये, यासाठी प्रयत्न करायला हवेत. या अनुषंगाने शासनाने उपसा सिंचन योजनांचे पाणी बंदिस्त जलवितरिकांमधून वितरित करण्याचा निर्णय घेतला. याचबरोबर उपलब्ध पाणी वाहून जावू नये, यासाठी अधिकाधिक पाणी साठे, तलाव, विहिरी, कूपनलिकांचे पुनर्भरण आदि पर्यायांचा वापर करावा, असे ते म्हणाले.
पाण्याचे महत्त्व अधोरेखित करण्यासाठी जलव्यवस्थापन कृती पंधरवडा राबवत असल्याबद्दल जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील, जलसंपदा (विदर्भ, तापी, कोकण खोरे विकास महामंडळ) व आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन यांचे अभिनंदन करून पालकमंत्री चंद्रकांत पाटील म्हणाले, आगामी काळात वापरलेल्या पाण्यावर पुनर्पक्रिया करून त्याचा पुनर्वापर करणे आज गरज बनली आहे. या पार्श्वभूमिवर सांडपाणी व्यवस्थापन प्रकल्प, औद्योगिक क्षेत्रातील पाणी, बागा, गाडी धुणे आदिंच्या पाण्यावर पुनर्प्रक्रिया करता येईल. यासाठी शेतकरी, औद्योगिक कंपन्यांना आवाहन करावे. पाण्याचे दुर्भिक्ष्य लक्षात घेऊन विविध मार्गाने पाण्याची बचत कशी करता येईल, या अनुषंगाने पाण्याचे काटेकोर नियोजन करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करावेत, असे त्यांनी यावेळी सूचित केले.
यावेळी पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते भूसंपादन संगणक प्रणालीचा तसेच कृष्णा कालवा स्वच्छता कामाचा रिमोटची कळ दाबून शुभारंभ करण्यात आला. प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते मोक्षगुंडम् विश्वेश्वरय्या यांचे प्रतिमापूजन करण्यात आले. यावेळी पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता, उपअभियंता, अधिकारी, कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.