गेवराई : बीड जिल्ह्यात एका भीषण अपघातात ६ जणांचा जागीच मृत्यू झाला. धक्कादायक गोष्ट म्हणजे त्यांच्या गाडीचा पहिल्यांदा अपघात झाला, त्यातून ते बचावले आणि लगेच गाडीतून खाली उतरले. मात्र, काळाचा घाला त्यांच्यावर बसलाच. कारण जीव वाचवण्यासाठी रस्त्यावर उतरलेल्या या प्रवाशांना ट्रकच्या रुपाने आलेल्या यमदूताने गाठले आणि ६ जणांचा जीव गेला. गेवराई शहरानजीकच्या गढी पुलावर सोमवार, दि. २६ मे रोजी रात्री ११ च्या सुमारास ही भीषण दुर्घटना घडली. अपघात एवढा भीषण होता की, ६ जण जागीच ठार झाले. या घटनेमुळे बीड हादरले असून मृतांच्या कुटुंबावर तर दु:खाचा अक्षरश: डोंगरच कोसळला.
बीड जिल्ह्यातून जाणाऱ्या धुळे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील गढी पुलावर भीषण अपघात झाला. गेवराई शहराच्या जवळ असलेल्या गढी पुलावर एका एसयूव्ही वाहन डिव्हायडरवर धडकल्याने किरकोळ अपघात झाला होता. त्यात कोणालाही दुखापत झाली नाही, कोणी जखमी झोले नाही. मात्र ती एसयूव्ही डिव्हायडरला धडकून तिथेच अडकल्याने ती बाहेर काढण्यासाठी गाडीत बसलेले सर्व बाहेर आले. मात्र ते रस्यावर उतरून उभे असताना त्याच महामार्गावरून जाणारा एक ट्रक भरधाव वेगाने आला आणि त्याने उभ्या असलेल्या लोकांना जोरदार धडक दिल्याने ते खाली कोसळले आणि चिरडले गेले.
हा अपघात एवढा भीषण होता की ट्रकखाली चिरडल्या गेलेल्या सर्वांचाच मृत्यू झाला. बाळू आतकरे, मनोज करांडे, कृष्णा जाधव, दीपक सरोया, भागवत परळकर आणि सचिन ननवरे अशी मृतांची नावे आहेत तर एक व्यक्ती गंभीर जखमी झाली असून त्यांच्यावर नजीकच्या रुग्णलयात उपचार सुरू आहेत. या अपघातानंतर ट्रक चालक फरार झाला. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तत्काळ धाव घेत पंचनामा केला. तसेच जखमीला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. फरार ट्रकचालकाचा पोलिसांकडून कसून शोध घेण्यात येत आहे. या भीषण अपघातामुळे संपूर्ण बीड हादरले आहे.