खा. राऊत यांचा नरकातला स्वर्ग पुस्तकातून मोठा गौप्यस्फोट, शनिवारी पुस्तकाचे प्रकाशन
मुंबई : प्रतिनिधी
गुजरातचे तत्कालीन मुख्यमंत्री नरेंद्र मोदी आणि तत्कालीन गृहराज्यमंत्री अमित शाह यांना शरद पवार आणि बाळासाहेब ठाकरे यांनी कायद्याच्या चौकटीबाहेर जाऊन मदत केली, असा गौप्यस्फोट संजय राऊत यांनी त्यांच्या ‘नरकातला स्वर्ग’ या पुस्तकात केला. हे पुस्तक राऊतांच्या ईडी कोठडी आणि आर्थर रोड जेल कारावासातल्या एकूण अनुभवासंदर्भातील आहे. शनिवार, दि. १७ मे २०२५ रोजी या पुस्तकाचा प्रकाशन समारंभ मुंबईत पार पडणार आहे. या पार्श्वभूमीवर हे गौप्यस्फोट समोर आले आहेत.
शरद पवार, उद्धव ठाकरे, जावेद अख्तर, साकेत गोखले यांच्या प्रमुख उपस्थितीत खा. संजय राऊत यांच्या या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा पार पडणार आहे. बाळासाहेब ठाकरे आणि शरद पवार यांनी कायद्याच्या चौकटीबाहेर जाऊन मोदी आणि शाहांची कशाप्रकारे मदत केली होती, याचा सविस्तर घटनाक्रम या पुस्तकात मांडला आहे.
नरेंद्र मोदी हे गुजरात दंगलीप्रकरणी एक आरोपी होते. तसेच अमित शाह हे एका खूनप्रकरणी आरोपी होते, त्यावेळी युपीएचे सरकार होते. मोदींना दंगलीप्रकरणी अटक करण्यापर्यंतची परिस्थिती होती. पण त्यावेळी शरद पवार यांनी एका कॅबिनेटमध्ये मत मांडले की राजकीय मतभेद असतील, तरीही लोकशाही मार्गाने निवडून आलेल्या मुख्यमंत्र्यांना अटक करणे योग्य ठरणार नाही. त्यांच्या या भूमिकेला काही सहका-यांनी मूकसंमती दर्शवली आणि त्यामुळे मोदींची त्यावेळी होणारी अटक टळली, असा खळबळजनक गौप्यस्फोट राऊतांनी या पुस्तकात केला.
त्याचप्रमाणे अमित शाह हे एका खून प्रकरणात आरोपी होते, तडीपार होते. सीबीआय चौकशी सुरू होती. तेव्हा मोदींनी शरद पवारांना फोन करून विनंती केली की, अमित शाह यांना या प्रकरणात मदत करा. तेव्हा सीबीआय चौकशीत त्या पथकातले महाराष्ट्र कॅडरचे एक अधिकारी होते, त्यांच्याशी संपर्क साधून पवारांनी मदत केली होती, असाही दावा राऊतांनी पुस्तकात केला. नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांनी पुढे बाळासाहेब ठाकरे आणि शरद पवार यांचे किती स्मरण ठेवले, असा सवाल राऊतांनी आपल्या पुस्तकात केला.
बाळासाहेबांनी केलेली मदत कोणत्याही कायद्याच्या चौकटीत बसत नाही. गुजरातमधून शाह तडीपार होते, सीबीआयने फास आवळत आणल्यामुळे शाहांच्या तात्पुरत्या जामिनावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले होते. तेव्हा बाळासाहेब मदत करू शकतात, असे शाहांना कुणीतरी सुचवले होते. एकेदिवशी भर दुपारी ते लहान जय शाहला घेऊन मुंबई विमानतळावर उतरले. विमानतळावरून काळी-पिवळी टॅक्सी पकडून ते वांद्रयाच्या दिशेने निघाले. शाहांनी ड्रायव्हरला मातोश्रीच्या मुख्य गेटवर सोडायला सांगितले. मात्र त्यावेळी कलानगरच्या मुख्य गेटवरच शाहांना अडवून ठेवण्यात आले होते. गुजरातचा आमदार आणि माजी मंत्री असून साहेबांना तात्काळ भेटायचे आहे, असा निरोप शाहांनी दिला होता. परंतु हा निरोप आत जात नव्हता. कारण त्यावेळी मातोश्रीची सुरक्षा व्यवस्था अनेक अडथळ््यांची होती. दुस-या दिवशी शाह पुन्हा मातोश्रीवर पोहोचले, त्यादिवशी ते मुख्य गेटवरून ड्रम गेटपर्यंत पोहोचू शकले. गुजरातचे एक आमदार त्यांच्या मुलासह आल्याचा निरोप शिवसेनाप्रमुखांपर्यंत पोहोचला. शाहांनी गुजरात दंगलीत हिंदुत्वासाठी केलेल्या कामाची शिक्षा आपल्यासह कुटुंब भोगत असल्याची दर्दभरी कहाणी सांगितली. मी अडचणीत आहे, अमुक अमुक न्यायमूर्तींसमोर केस सुरू आहे. तडीपार आहे वगैरे असे सगळे शाहांनी बाळासाहेबांना सांगितले. मी काय करू, असा प्रश्न बाळासाहेबांनी शाहांना विचारला. तेव्हा आप बात करेंगे तो न्यायमूर्ती आपकी बात मान लेंगे. तुमचा शब्द ते खाली पडू देणार नाहीत, असे शाह म्हणाले. शाहांकडून विषय समजून घेतल्यानंतर बाळासाहेबांनी एक महत्त्वाचा फोन कुणाला केला (हे सांगणं नैतिकतेला धरून नाही), असे राऊतांनी या पुस्तकात म्हटले.
अमित शाहांच्या प्रकरणाशी संबंधित व्यक्तीसोबत मनोहर जोशींच्या फोनवरून बाळासाहेब थेट बोलले. तुम्ही कोणत्याही पदावर बसलेले असा, पण तुम्हीही हिंदू आहात हे विसरू नका, हे बाळासाहेबांच्या संवादाचे शेवटचे वाक्य होते. त्या एका फोनने अमित शाह यांच्या जीवनातल्या आणि राजकीय प्रवासातल्या बहुतेक अडचणी दूर झाल्याचा दावा राऊतांनी केला आहे. या सर्व घडामोडी, घटनाक्रम यांचा उल्लेख पुस्तकात करण्यात आला आहे.