आरोग्य योजनांचे तब्बल २७० कोटी रुपये थकित
मुंबई : प्रतिनिधी
एकीकडे जा-य सरकार लाडक्या बहिणीच्या योजनेसाठी पैसा कमी पडणार नाही, असे सांगून याबाबत सातत्याने पाठ थोपटून घेत आहे. मात्र, लाडकी बहीण योजनेमुळे अनेक योजनांचे पैसे थकित आहेत. विशेष म्हणजे आरोग्य व्यवस्थेसारख्या संवेदनशील विभागाचेदेखील पैसे थकित आहेत. लाडक्या बहिणीच्या नादात अक्षरश: आरोग्याचा खेळखंडोबा झाल्याचे चित्र निर्माण झाले आहे. कारण आयुष्मान भारत आणि महात्मा फुले जनआरोग्य योजनेचे मिळून १ एप्रिल २०२४ ते ३१ जानेवारी २०२५ या कालावधीतील तब्बल २७० कोटीहून अधिक रक्कम संबंधित रुग्णालयांना अदा केली नसल्याचे समोर आले आहे. मोठ्या प्रमाणावर सरकारकडे पैसा थकित असल्याने संबंधित रुग्णालयांकडून रुग्णांना दाखल करून घेण्यास टाळाटाळ केली जात आहे, असे मोदी यांनी निवेदनात म्हटले आहे.
कोल्हापूर शिवसेना ठाकरे गटाचे शहरप्रमुख सुनील मोदी यांनी १ एप्रिल २०२४ ते ३१ जानेवारी २०२५ या कालावमधीत आयुष्मान भारत आणि महात्मा फुले जनआरोग्य योजनेत राज्यातील संलग्न रुग्णालयांची सरकारकडे किती रक्कम थकित आहे, याची माहिती घेण्यासाठी आरटीआय दाखल केला होता. सुनील मोदी यांनी जिल्हानिहाय किती रक्कम सरकारकडून अदा करण्यात आलेली नाही, याची माहिती दिली. ही आकडेवारी अतिशय धक्कादायक आहे.
एकीकडे महायुती सरकार विविध योजनांच्या नावाकाली जनहित साधले जात असल्याचे सांगत आहे. परंतु प्रत्यक्षात आरोग्यासारख्या संवेदनशील विषयावर सरकार गंभीर नसल्याचे समोर आल्याने चिंता व्यक्त केली जात आहे. खुद्द वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रिफ यांनी गल्ली ते दिल्ली दररोज गाजावाजा केली जाणारी आयुष्मान योजना मुंबईमधील कोणत्याच रुग्णालयात लागू नसल्याचे आज कोल्हापुरात बोलताना सांगितले. त्यामुळे शासकीय जाहिराती करून डंका पिटला जात असताना गरीब रुग्णांची मेट्रो शहरातील किती वाताहत होत असेल, याचा अंदाज न केलेला बरा अशी स्थिती झाली आहे.
९ महिन्यांची रक्कम थकली
या आकडेवारीनुसार १ एप्रिल २०२४ ते ३१ जानेवारी २०२५ या कालावधीत सरकारकडून संलग्न रुग्णालयांना महात्मा फुले जनआरोग्य योजनेअंर्गत २२०,२४,६५,६५५ कोटी थकित आहेत. तसेच पंतप्रधान आयुष्मान भारत आरोग्य योजना अंतर्गत ३७,२९,९०,६५० कोटी रुपये थकित आहेत.
राज्यात योजना बंद पडण्याच्या मार्गावर ?
सुनील मोदी यांनी राज्यात दोन्ही योजना बंद पडण्याच्या मार्गावर असल्याचे म्हटले आहे. या योजनेचा पुरेपूर फायदा रुग्णांना व्हावा व संलग्न रुग्णालयातील थकित रक्कम त्वरित अदा कराव्यात, यासाठी सार्वजनिक आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांना निवेदन देणार असल्याचे म्हटले आहे. मागण्या मान्य झाल्या नाही, तर ठाकरे गटाकडून राज्यभर आंदोलन उभा करण्याचा इशारा देण्यात आला आहे.