मुंबई : प्रतिनिधी
ग्रामीण भागातील महिला बचत गटांच्या उत्पादनांना हक्काची बाजारपेठ उपलब्ध करून देण्यासाठी ग्रामविकास विभागाच्या ‘उमेद-महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियाना’अंतर्गत राज्यातील १० जिल्ह्यांमध्ये ‘उमेद मॉल’ (जिल्हा विक्री केंद्र) उभारण्यास मंत्रिमंडळ बैठकीत मंजुरी देण्यात आली. या योजनेसाठी एकूण २०० कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. ग्रामीण भागात छोट्या व्यावसायिक महिलांना आता यामुळे नवीन उमेद मिळणार आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत ८ महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले. त्यामध्ये उमेद मॉल उभारण्यात येणार असल्याचा निर्णय राज्याच्या ग्राम विकास मंत्रालयाच्या वतीने घेण्यात आला आहे. प्राथमिक तत्त्वावर राज्यातील १० जिल्ह्यात उमेद मॉल उभारण्यात येणार आहेत. महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानांतर्गत १० जिल्ह्यांत उमेद मॉलची (जिल्हा विक्री केंद्र) उभारणी केली जाणार असून महिला बचत गटाने तयार केलेल्या उत्पादनांना हक्काची बाजारपेठ उपलब्ध करुन देण्याचे काम या उमेद मॉलच्या माध्यमातून होणार आहे.
ग्रामीण भागातील महिलांतील उद्यमशीलतेला चालना देण्यासाठी सुरू झालेल्या स्वयंसहाय्यता समूहांच्या विविध उत्पादनांना स्थानिक आणि राष्ट्रीय बाजारपेठ मिळावी, हा यामागचा उद्देश आहे. पहिल्या टप्प्यात १० जिल्ह्यांमध्ये हे मॉल कार्यान्वित करण्यात येणार असून, नंतर टप्प्याटप्प्याने ही योजना इतर जिल्ह्यांत विस्तारली जाणार आहे. उमेद मॉलसाठी जिल्हा परिषदांकडून प्रस्ताव मागवले जातील. ज्या जिल्ह्यांमध्ये उमेद मॉलसाठी जमीन उपलब्ध असेल आणि ती मध्यवर्ती ठिकाणी असेल, त्या जिल्ह्यांची निवड केली जाईल, असे सांगण्यात आले.