भाजीपाल्याचे भाव कडाडले, महिनाभरात गाठू शकतो उच्चांक
मुंबई : प्रतिनिधी
महाराष्ट्रासह दुसर्या राज्यात अवकाळी पावसाने थैमान घातले आहे. अनेक भागांतील पिकांना मोठा फटका बसला आहे. टोमॅटो, कांद्यासह इतर नगदी पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. त्यामुळे उत्तर भारतासह अनेक मोठ्या शहरात भाजीपाल्याचे भाव वाढले आहेत. ग्राहकांच्या खिशावर त्याचा परिणाम दिसून येत आहे. जूनच्या सुरुवातीलाच टोमॅटो २४ रुपयांहून ३० रुपयांवर पोहचला आहे तर महिनाभरात हा भाव ८०-१०० रुपयांच्या घरात पोहचण्याची शक्यता आहे तर दुसरीकडे कांद्याच्या किंमतीत किलोमागे ६ रुपयांची दरवाढ झाली आहे. एका महिन्यात कांद्याचा भाव ५० रुपयांपेक्षा अधिक वधारण्याची भीती व्यक्त होत आहे.
राज्यात मे महिन्यातच अवकाळी आणि पूर्व मान्सूने धडक दिली. त्यामुळे अनेक भागांना पावसाने झोडपून काढले. त्यात नगदी पिकांचे मोठे नुकसान झाले. कांदा काढणी सुरू असतानाच पावसाने थैमान घातल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले. मे महिन्याच्या दुसऱ्या पंधरवाड्यातच कांद्याच्या किंमतीत २० टक्क्यांची वाढ दिसून आली. पावसामुळे कांदा आणि टोमॅटो पिकाचे मोठे नुकसान झाल्याचे समोर येत आहे. तर तुफान पावसामुळे भाजीपाला वाहतूक आणि पुरवठ्यावर प्रतिकूल परिणाम दिसून आला. त्यामुळे उत्तर भारतातच नाही तर देशातील अनेक भागात दोन्ही मालाच्या किंमतीत वाढ दिसून आली. किंमतीत अजून वाढ होण्याची शक्यता आहे.
जूनच्या सुरुवातीच्या दोन दिवसात टोमॅटोची किंमत ४० ते ५० टक्क्यांनी वधारली. किरकोळ किंमतीत वाढ दिसून आली. ३१ मे रोजी देशाची राजधानी दिल्लीत कांद्याची किरकोळ किंमत २० रुपये प्रति किलोग्रॅम होती, २ जून रोजी ती वाढून ३० रुपये प्रति किलोग्रॅम इतकी झाली तर टोमॅटोचा भाव २ जून रोजी २० रुपयांहून थेट ३५ रुपये प्रति किलोग्रॅमवर आला. दोन दिवसात टोमॅटो प्रति किलो १५ रुपयांनी वधारला. तर तर कांद्याच्या किंमतीत ५० टक्के तेजी दिसून आली.