आंदोलकांनी थेट गृहमंत्र्यांचे घर पेटविले
क्वेटा : वृत्तसंस्था
भारताने पहलगाम हल्ल्यानंतर सिंधू नदीचे पाणी अडविण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे पाकिस्तानची पाणी कोंडी झाली. त्यामुळे सिंध प्रांतात आधीच अस्वस्थता असताना सरकारच्या ६ कालवे प्रकल्पांना सिंध प्रांतातील लोकांचा प्रचंड विरोध आहे. यावरून पाण्यासाठीच्या आंदोलनाला आज हिंसक वळण लागले. संतप्त आंदोलकांनी थेट पाकिस्तानातील सिंध प्रांताचे गृहमंत्री जियाउल हसन लंजर यांचे नौशेरो जिल्ह्यातील घर जाळले. तसेच घराची मोठी नासधूस केली. घरातील लोकांना मारहाण करतानाच आजूबाजूची शेकडो वाहने पेटवून दिली. त्यामुळे मोठे नुकसान झाले.
भारताने पाकिस्तानची पाणी कोंडी करण्यासाठी भारताने आधीच सिंधू नदी पाणी वाटप करार रद्द करीत पाकिस्तानला जाणारे सिंधू नदीचे पाणी अडवले. त्यामुळे पाण्याचे संकट भेडसावत असतानाच सिंध प्रांतातील सरकारने ६ कालवे उभारण्याचे काम सुरू केले. याला सिंध प्रांतातील नागरिकांचा विरोध होता. त्यामुळे सिंध प्रांतात गृहयुद्धसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे.
राष्ट्रीय महामार्गावर मोरो शहरात गृहमंत्र्यांचे घर आहे. याठिकाणी सिंधचा पाणी प्रश्न आणि ६ कालव्यांना विरोध करण्यासाठी आज आंदोलन करण्यात येत होते. सिंध प्रांतातील सरकार त्यांची जमीन आणि पाणी काढून खाजगी कंपन्यांना देत आहे, असा आंदोलकांचा आरोप आहे. सुरुवातीला पोलिस आणि आंदोलकांत बाचाबाची झाली. त्यानंतर पोलिस-आंदोलकांत झडप झाली. त्यावेळी संतप्त आंदोलकांनी पोलिसांसह गृहमंत्र्यांच्या घरावर हल्ला चढवला. पोलिसांची वाहने पेटवून दिली. या आंदोलनात दोन आंदोलकाचा मृत्यू झाला. त्यामुळे आंदोलक अधिक आक्रमक झाले. संतप्त जमावाने पोलिसांची वाहनेही जाळली. त्यात एक डीएसपी आणि इतर अनेक पोलिस कर्मचारी जखमी झाले आहेत.
पाकमधील आंदोलक सरकारच्या नियंत्रणाबाहेर गेल्याचे दिसत आहे.