मुंबई : प्रतिनिधी
राज्य सरकारकडून आयुष्यमान भारत, मिशन महाराष्ट्र समितीचे पुनर्गठन करण्यात आले असून डॉ. ओमप्रकाश शेटे यांची अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. राज्य शासनाच्या या समितीमध्ये शेटेंसह सहा सदस्यांचा समावेश आहे. राज्यात महात्मा ज्योतिराव फुले जनआरोग्य योजना आणि आयुष्मान भारत प्रधानमंत्री जनआरोग्य योजनेची प्रभावी अंमलबजावणी करण्याचे अधिकार या समितीला देण्यात आले आहेत.
केंद्राच्या आयुष्यमान भारत आणि राज्याच्या महात्मा फुले जन आरोग्य योजना या दोन्ही योजनेंच्या सुविधा योग्य पद्धतीने गरजू रुग्णांपर्यंत पोहोचवण्यासाठी या समितीची नेमणूक करण्यात आली आहे. राज्यातील गरजू नागरिकांना दर्जेदार आरोग्य सेवा मिळाव्यात, तसेच महागड्या शस्त्रक्रिया या योजनेच्या माध्यमातून करता याव्यात, यासाठी ही समिती प्रयत्न करणार आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस २०१४-२०१९ दरम्यान असताना डॉ. ओमप्रकाश शेटे यांच्याकडे मुख्यमंत्री सहाय्यता निधीची जबाबदारी होती. त्यावेळी राज्यातल्या गरजू लोकांपर्यंत मदत जास्तीत जास्त कशी पोहोचवता येईल, यासाठी त्यांनी प्रयत्न केला होता. त्यांच्या या कामाचे कौतुकही मोठ्या प्रमाणात झाले होते. त्यानंतर डॉ. ओमप्रकाश शेटे हे तत्कालीन केंद्रीय राज्यमंत्री भारती पवार यांचे ओएसडी बनले. राज्यात आता महायुतीचे सरकार आल्यानंतर त्यांच्याकडे पुन्हा एकदा मोठी जबाबदारी देण्यात आली आहे.
